Tuesday, 15 October 2019

रोजचे आयुष्य

रोजचे आयुष्य.....
रोजच सकाळी आम्ही लवकर उठतो,
घड्याळाशी स्पर्धा करत
त्यालाही कधी कधी मागे टाकतो...
धावपळ अशी रोजचीच झाली,
नवीन असं काहीच त्यात नाही.......
              अंक मोजा,शब्द लिहा,
               गणित सोडवा,पाठ वाचा,
               प्रश्नांची उत्तरे शोधा,
              कधी उत्तरांनाच प्रश्न विचारा...
              धांदल रोजचीच ही अभ्यासाची,
              नवीन असं काहीच त्यात नाही.......
माहिती भरा, कागद रंगवा,
ऑनलाईन राहत स्मार्ट व्हा...
ट्रेनिंग,मीटिंग तर असतेच नेहमी,
मधूनच लागते कधी शिबिराची वर्णी...
आला जी.आर,गेला जी.आर,
चर्चासुद्धा ही रोजचीच झाली,
नवीन असं काहीच त्यात नाही....
               रोजचेच असले सारे जरी,
               ऊर्जा मात्र असते रोजच नवी....
               अपेक्षेने आपल्याकडे पाहणारी,
               चिमुकली नजर भिरभिरणारी......
इवल्याशा त्या डोळ्यांमध्ये,
स्वप्ने उद्याची डोकावणारी....
या पंखांना बळ देण्या सज्ज नेहमी,
तुमच्यासारखी माणसे धडपडणारी.....
              म्हणून वाटते,
               रोज रोज जरी तेच असले,
               नवीन जरी त्यात काही नसले....
                नसण्यातील असण्याला शोधत जावे,
                रोजचेच आयुष्य रोजच नव्याने जगत जावे...........
                                   श्वेता पोळ-गिजरे
                     (समस्त शिक्षकांसाठी एका शिक्षिकेकडून)

Monday, 14 October 2019

नाव

नाव.....
        नावात काय आहे,असं आपण सारखं ऐकत आलोय.पण मला नाही तसं वाटत.नाव म्हणजे आपण असतो आणि आपल्यामुळेच आपलं नाव असतं. आता हेच बघा ना,आपल्या अमुक एका मैत्रिणीचं किंवा मित्राचं नाव घेताच ती व्यक्ती आपल्या नजरेसमोर उभी राहते,कारण की तिच्या नावाशी तिच्यातील सगळे स्वभावगुण आपण नकळत जोडलेले असतात.आपल्या जन्मापासून आपली सोबत आपलं नाव करत असतं,ते अगदी शेवटपर्यंत. स्त्रियांच्या बाबतीत हे विधान तितकंसं ग्राह्य धरता येणार नाही,तो भाग अलाहिदा.पण आपलं नाव म्हणजे आपली ओळख असते.ते उज्ज्वल करायचं की खराब करायचं,हेसुद्धा आपल्यावरच अवलंबून असते.
               प्रत्येकाला आपलं नाव असं प्रसिद्धीच्या झोतात असलेलं आवडतं, साधं आपल्याच नावाशी साधर्म्य असणारी एखादी मोठी व्यक्ती असली की आपलाही ऊर अभिमानाने(उगीचच) नक्कीच भरून येतो.ही सगळी आपल्या नावाचीच कमाल. आपलं नाव कुठेही लिहिलेलं आपल्याला नक्कीच आवडत नाही,कारण ते आपलं नाव असतं, आणि त्याला आपण स्वतः एवढंच जपत असतो,म्हणून मला वाटतं की,नावात खूप काही असतं... नाव म्हणजे आपल्या स्वभावाचं, गुणदोषांचं प्रतिबिंब असतं... हा एवढा सगळा शब्दप्रपंच कशासाठी...तर आज एका मैत्रिणीने मला माझ्या नावाची पाटी भेट दिली,तेव्हा वाटलं...कशाला उगीच,काय एवढं करायचं आपलं नाव वर्गात लावून...पण परत मनात एवढ्या सगळ्या विचारांनी गर्दी केली की नाव खरंच किती अविभाज्य भाग आहे आपल्या आयुष्याचा याची जाणीव झाली.आता या लेखाखाली मीही माझं नाव लिहिणारच आहे😊....
                                                        श्वेता पोळ