Wednesday, 15 April 2020

मी अनुभवलेला वासोटा

*मी अनुभवलेला वासोटा*.....
खूप दिवसांपासून इच्छा होती ,जंगल जवळून बघण्याची,जंगलातून फिरण्याची.आणि अचानक एक दिवस ही संधी आयतीच मिळाली.सांगलीच्या सह्यगिरी ट्रेकर्स समूहाने एक ट्रेकिंग खास महिलांसाठी आयोजित केले होते. मी तयारच होते, सोबतच अजून 2 मैत्रिणींना तयार केले आणि आम्ही वाट पाहू लागलो त्या दिवसाची.रविवारचा दिवस उजाडला.आदल्या दिवशी पावसाने गारासकट येऊन थैमान घातले होते त्यामुळे महापारेषण पहाटेपासूनच रुसून बसलेले होते.मग काळोखातच जे सापडेल ते बॅगेत अक्षरशः कोंबलं आणि बस गाठायला स्टँडवर पळालो...
                 गाड्या सांगलीहून येणार होत्या,त्यामुळे आम्ही उंब्रज पर्यंत एसटी ने गेलो.थोड्याच वेळात आमची गाडी आली आणि आम्ही गाडीत शिरलो.गाडीत गेल्यावर आमच्या असं लक्षात आलं,की आपल्या वयाचं तर कुणीच नाही या गाडीत,आता आपल्याला नक्कीच कंटाळा येणार,बायकांच्या टिपिकल गप्पा वगैरे ऐकाव्या लागणार.पण थोड्याच वेळात असं लक्षात आलं की सगळ्या जणी एवढ्या उत्साही होत्या की त्यातल्या एक मॅडम आम्हाला म्हणाल्या,"पोरींनो, आजचा दिवस आम्ही तुमच्या वयाच्या होणार बरं का!"आम्ही म्हणालो,"ये हुई ना बात".आता आपला प्रवास मस्तच होणार.गप्पा मारता मारता बामणोली आलं.थोडा वेळ विश्रांती घेवून,नाश्ता करून झाला. आता कधी एकदाचे लाँच मध्ये बसतोय असं झालं होतं.
             11 वाजता आमचा लाँच चा प्रवास सुरु झाला.आपण रोज बघतो ती कोयना आपल्या पोटात इतकं पाणी सामावून ठेवते,याचा तर आम्हाला विश्वासच बसत नव्हता.अथांग असा हा शिवसागर जलाशय.त्यातून अगदी तोऱ्यात पाणी कापत आमची लाँच निघाली.थोड्या वेळाने एका बाजूला 4-5घरे दिसायला लागली.लाँच चालवणाऱ्या काकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं, की त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे,पण त्यांचे अजून काही प्रश्न आहेत शासनदरबारी, ते सोडवल्याशिवाय जाणार नाहीत ते.बाप रे! कसे राहत असतील हे लोक?जिकडे पाहावे तिकडे पाणी,साधी वीज ही नाही इथे,संपर्काची साधने तर सोडूनच द्या.ज्या ज्या गावांनी आपल्या जमिनी या धरणासाठी दिल्यात,त्यांचा खरंच अभिमानच वाटला आम्हाला.आपलं घर,गाव,शेती सोडून जाणं, इतकं सोपं नाहीये.... त्यांनी आपली जनावरेही इथेच सोडली होती,बऱ्याच ठिकाणी म्हशी,बैल दिसत होते.असा दीड तासांचा प्रवास झाल्यानन्तर वासोट्याचा डोंगर दिसायला लागला.लाँच किनाऱ्याला लागली आणि आमची खऱ्या अर्थाने चढाई सुरू झाली....
               जलाशयाचं पाणी आता कमी व्हायला लागलंय, त्यामुळे जुन्या गावांचे थोडेसे अवशेष रस्त्याच्या बाजूला दिसत होते.थोडं अंतर चालून गेल्यावर मोठं असं मैदान दिसलं,त्या मैदानातून चालत गेलो की अभयारण्याची कमान दिसली.कोयना अभयारण्याचं क्षेत्र तसं खूप मोठं आहे.कमानीतून आत गेल्यानंतर वनविभागाचा चेक नाका आहे,इथे आपल्या बॅग तपासतात,त्यात काही आक्षेपार्ह गोष्ट आढळली,तर लगेच जप्त करतात.आणि हो,आपल्याला आधी वनविभागाचा परवाना घ्यावा लागतो,त्याशिवाय आपल्याला आत प्रवेश नाही.सगळी औपचारिकता झाल्यावर,चालायला सुरुवात झाली.रस्त्याच्या बाजूला हेळा, कोकम,ऐन,जांभूळ अशी झाडे तर अळू,करवंद यांची झुडुपं दिसत होती.1 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर एक मोठा ओढा आहे आणि ओढ्याच्या काठावर मारुती च मंदिर आहे.तिथुन किल्ला 3 किलोमीटर आहे.पण चढण असल्यामुळे आपल्याला हे अंतर लवकर संपत नाही.जसं आपण पुढे जातो तसं हे जंगल अजून घनदाट व्हायला लागतं. चोहोबाजूंनी दिसणारे उंचच उंच वृक्ष,त्या वृक्षांना लपेटून वरती जाणाऱ्या आणि क्षणभर सापाचा आभास करून देणाऱ्या वेली, मधेच किलबिल करणारे पक्षी,पायाखाली येणाऱ्या पाचोळ्याचा खस खस असा आवाज आणि एखादा वन्य प्राणी समोर येतोय की काय ही मनातली भीती,एकंदर वातावरण गंभीर बनत चाललं होतं.चालून चालून धाप लागल्यामुळे गप्पांचा ओघ आता मंदावला होता,प्रत्येकजण वर वर बघत हळू हळू एकेक पाय पुढे टाकत होता.पण काही केल्या डोंगर दिसायचं नाव घेईना.2 किलोमीटर अंतर संपून गेलं असेल,आता जंगल कमी झालं आणि पुन्हा ऊन चटकायला लागलं.इथे थोडी अवघड वाट होती.चालून चालून खडे खाली घसरले होते,त्यामुळे त्यावर पाय ठेवला की ते परत घसरायचे,मग शेजारी असलेल्या दगडाला,फांद्याला धरून कसेबसे वर वर चढत गेलो.
                     अशीच एक चढण चढून आम्ही वर आलो,सगळीकडून घामाच्या धारा वाहत होत्या,आणि तेवढ्यात मागे लक्ष गेलं.आमच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला....अप्रतिम...अहाहा..काय दृश्य होतं ते.तीनही बाजूनी वेढलेले डोंगर,त्या डोंगरावर ढगांनी धरलेली सावली,आणि मधेच दिसणारा शिवसागर जलाशय....जवळजवळ 6000 फुटावरून आम्ही हे दृश्य बघत होतो...अगदी डोळ्याचे पारणे फिटले....पुढे वळून पुनः चढायला सुरुवात केली आणि 15 मिनिटांत आम्हाला किल्ल्याचा बुरुज दिसायला लागला...बुरुज दिसल्यावर आपोआपच पायांची गती वाढली,शिवकालीन आठवणी पाहण्यासाठी आता सगळं शरीर उत्सुक झालं होतं...अगदी पायथ्याला गेल्यावर दगडी पायऱ्या आहेत,त्या चढून आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला.तब्बल दोन ते अडीच तासांच्या चढाईनंतर किल्ल्यावर आम्ही पाऊल ठेवलं.किल्ल्यावर सुध्दा एक प्राचीन मारुती मंदिर आहे.त्याच्या मागच्याच बाजूला पाण्याची टाकी आहे,एका भिंतीमुळे ती दोन भागात विभागली आहे.त्या टाकीत भर उन्हाळ्यात पिण्यायोग्य भरपूर पाणी आहे.तिथूनच मागच्या बाजूला एक कडा आहे,तिथून आपल्याला सह्यादीची भव्यता दाखवून देणारा एक भलामोठा कडा आहे.आणि समोरच नागेश्वर सुळका आहे...मंदिराच्या डाव्या बाजूला शिवरायांच्या काळात जिथे कैद्यांना ठेवले जायचे ती जागा आहे.आता आपल्याला तिथे फक्त एक चौथरा दिसतो.गड पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट नक्कीच जाणवते ती म्हणजे शिवाजी महाराज गडबांधणी आणि गडाचं व्यवस्थापन किती अचूक करायचे,त्यांची भविष्याकडे पाहण्याची दृष्टी सुद्धा अपूर्व होती.त्यांना कितीही मुजरे केले तरी थोडेच आहेत.त्यांच्या चरणी पुनः पुनः नतमस्तक व्हावे वाटते ते यामुळेच.आता चालून आलेला थकवा कुठल्याकुठे नाहीसा झाला होता.छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावरून एक वेगळीच ऊर्जा मनात साठवून सगळे पुनः आता गडउतार व्हायला लागले..सूर्य सुद्धा दिवसभराच्या धावपळीने थकून मावळतीकडे झुकू लागला आणि सगळ्या लाँच शिवसागर जलाशयातून वेगाने मार्ग आक्रमत किनाऱ्याकडे झेपावू लागल्या........
                                   *सह्याद्री आणि कोयनेच्या जाज्वल्य अभिमानातून*........
                                          ✒️श्वेता पोळ-गिजरे