Saturday, 11 February 2017

आठवणीतली यात्रा


आज आईचा फोन आला,सांगत होती कि आज खंडोबाची यात्रा आहे म्हणून.......
खंडोबाची यात्रा ऐकल आणि मन लगेच भूतकाळात हरवून गेलं......
तिसरी किवा चौथी ला असेन मी तेव्हा,माघ पौर्णिमेला खंडोबाची यात्रा असते.हे खंडोबाच मंदिर आमच्या गावापासून जवळजवळ ५ किमी.असेल,पण डोंगरावर होत.एरवी कधीही लक्ष न देणारे आम्ही आजच्या दिवशी मात्र सकाळपासून तिकडे डोळे लावून बसायचो.यात्रेला जायची तर खूप इच्छा असायची,पण शाळा बुडवायची हिम्मत नव्हती बर आमच्यात.सकाळपासून आम्ही त्याच खंडोबाला मनोमन प्रार्थना करायचो,”देवा गुरुजींना आम्हाला सुट्टी द्यायला सांग बाबा”.....आणि अखेर आमची परीक्षा बघून बघून गुरुजी आम्हाला दुपारी सुट्टी द्यायचे.मग आमची गाडी खुश.यात्रेला कस जायचं,कुणासोबत जायचं,मैत्रिणीला कुठे भेटायचं अस सगळ प्लानिंग व्हायचं,आणि आम्ही निघायचो.यात्रेला जायचं,ते म्हणजे चालत चालत.....पण गप्पा मारत रस्ता कधी संपायचा कळायचा नाही.तिथे पोचलं कि फोन वगैरे काही नसताना वर्षा मात्र अगदी ठरल्याप्रमाणे भेटायची.आज ते आठवलं तरी विशेष वाटत.
       आमची खंडोबाची यात्रा म्हणजे एक विशेष गोष्ट आहे.डोंगरावर मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत.आणि या पायऱ्या म्हणजे जणू काही आमचं राळेगण आणि मांडवगण या गावामधली बोर्डर आहे.अलीकडे राळेगण आणि पलीकडे मांडवगण.ही यात्रा बारा गाड्यांची यात्रा म्हणून ओळखली जाते.दोन्ही बाजूला पायथ्याला दोन्ही गावातील कमीत कमी बारा बैलगाड्या जोडलेल्या असतात.या सगळ्या गाड्या,जो माणूस ठरलेला असतो ,त्याने ओढायच्या.दोन्ही गावातील ही दोन माणसे ठरलेली असतात,त्यांना देव म्हणतात.हे दोघेही अंघोळ करून येतात आणि गाड्या ओढायला सुरुवात करतात.वाजतगाजत हा कार्यक्रम चालतो.लोकांचा जल्लोष बघून ती जणू काही स्पर्धा वाटते.ठराविक उंचीपर्यंत आल्यावर मग गाड्यापासून देवांना सोडवतात आणि परत मंदिरात नेतात.तोपर्यंत पौर्णिमेचा चंद्र क्षितिजावर येऊन ठेपलेला असतो.मग सुरु होते लोकांची घाई,घरी जाण्यासाठी.लोक निघतात,ते राळेगणच्या गाड्या पुढे आल्या कि मांडवगण च्या या विषयावर चर्चा करत......


                                  श्वेता